Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 30, 2023

हैबतपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न






























































हैबतपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न* 

हैबतपुर - हैबतपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद सप्टेंबर 2023 ची दिनांक 28/9/2023 रोजी तोंडार केंद्राची शिक्षण परिषद हैबतपुर शाळेच्या वतीने हैबतपुर येथे संपन्न झाली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख मा. प्रतिभा मुळे मॅडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून कें मु अ संजय बिरादार, ग्राम सेविका जाधव उज्ज्वला , साधन व्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे, सरपंच अनुराधा नरहरे, उपसरपंच शोभा बिरादार, गजानन नरहरे, सुधाकर दंडिमे आदी जण उपस्थित होते.नियोजित सर्व विषयावर सुलभक किरण पाटील ,मनोहर पांडे, पुंडलिक मुळे, पप्पुलवाड अविनाश, ज्ञानेश्वर बडगे व साधन व्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी सविस्तर विषयानुसार मार्गदर्शन केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रशासकीय बाबी व शंकासमाधान केंद्र प्रमुख मा. प्रतिभा मुळे केले. या शिक्षण परिषदेत ग्राम पंचायत च्या वतीने हैबतपुर शाळेला 6 टेबल, 24 खुर्ची, 1कपाट, साऊंड बॉक्स, 4 फॅन इत्यादी फर्निचर दिलेले आहे. हे फर्निचर साहित्य दिल्या बद्दल उपस्थित सर्वांनी सरपंच अनुराधा नरहरे, ग्राम सेविका जाधव उज्ज्वला , गजानन नरहरे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. या शिक्षण परिषदेला केंद्रांतर्गत मुख्याध्यापक सोमवंशी गुरुजी, चंद्रकांत कोलेवाड, संजय बिरादार, अशोक पांडे, राजेंद्र लामतुरे, संजीव केंद्रे, खुर्शीद शेख, संजय वाघमारे, लता पटवारी, शोभा भंडारे, ममता गंदमवार, ज्ञानेश्वर बडगे, रामदास वंगरवाड व केंद्रांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन संजय मळभगे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांनी केले.

आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड कार्यक्रम संपन्न






























आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड कार्यक्रम संपन्न*

*लातूर - महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणरत्न अवार्ड  कार्यक्रम दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी पत्रकार भवनात संपन्न झाला.सन्मान गुरुजनांचा, सन्मान सर्वोच्च पदवी प्राप्त पीएच डी धारकांचा  लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकविणाऱ्या उपक्रमशील होतकरू व आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या तसेच त्यांच्या सेवाकाळात सेवा कर्तव्याबरोबरच आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी शिक्षणाचा ध्यास घेऊन पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक पात्रता वाढवून शिक्षण क्षेत्रातील पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी संपादन करणाऱ्या शिक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणरत्न अवार्ड  2023 विविध मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री शिवाजीराव साखरे (वाघ),थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी डीन, तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच विचारशलाका या त्रेमासिकाचे संपादक मा.डॉ. नागोराव कुंभार,सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार व साहित्यिक मा. भारत सातपुते, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्यउपाध्यक्ष श्री. चंदू अण्णा घोडके, लातूर जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर, सरचिटणीस मा. बालाजी गारमपल्ले, कार्याध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बडगे, कोषाध्यक्ष मा. साईनाथ तोटावाड, उपाध्यक्ष  शिवलिंग मार्गपवार आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मुर्ती सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे मानकरी..1) डॉ. रमेश शेळके* (सेवानिवृत्त), 2) डॉ. मारुती सलगर (वरिष्ठ अधिव्याख्याता , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव), 3) डॉ.बालाजी संमुखराव
 (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासेगाव ता. औसा जि. लातूर), 4) डॉ. दिनेश भिसे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानगाव ता.रेणापूर जि. लातूर), 5) डॉ. नागेश पाटील (जिल्हा परिषद प्रशाला भादा ता. औसा जि. लातूर), 6) डॉ.  विष्णू नरहरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुऱ्हाळ ता. निलंगा जि.लातूर), 7) डॉ. मारोती कदम
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी बु ता.अहमदपूर जि.लातूर), 8) डॉ. सतीश सातपुते (जिल्हा परिषद प्रशाला शासकीय वसाहत ता.जि.लातूर), 9) डॉ. सचिन डेंगळे
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुशिराबाद ता.जि.लातूर), 10) डॉ.स्मिता मामीलवाड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणूसमारवाडी ता. रेणापूर जि. लातूर), 11) डॉ. राजश्री शेरे
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाखरसांगवी ता.जि.लातूर). तद्नंतर पुरस्कार प्राप्त शिक्षण रत्ना पैकी डॉ. राजश्री शेरे, डॉ. बालाजी समुखराव व डॉ. मारुती सलगर यांनी त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्य व पिचडी शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी केलेले अथक परिश्रम या विषयावर सविस्तर मनोगतातून विचार मांडले. तसेच या कार्यक्रमाचे मान्यवर मा. शिवाजीराव साखरे वाघ, सुप्रसिध्द साहित्यिक भारत सातपुते वस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी डीन, तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच विचारशलाका या त्रेमासिकाचे संपादक मा. नागोराव कुंभार यांनी अतिशय मार्मिक व सूसंस्कारीत, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ),थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी डीन, तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच विचारशलाका या त्रेमासिकाचे संपादक मा.डॉ. नागोराव कुंभार,सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार व साहित्यिक मा. भारत सातपुते, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष मा. चंदू अण्णा घोडके, लातूर जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर, सरचिटणीस मा. बालाजी गारमपल्ले, कार्याध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बडगे, कोषाध्यक्ष मा. साईनाथ तोटावाड, उपाध्यक्ष  शिवलिंग मार्गमपवार, उदगीर तालुकाध्यक्ष मारोती लांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार कार्यमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर, कार्यमाचे सुत्रसंचलन आदर्श व उपक्रमशील शिक्षक मा. शंकर स्वामी व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी ते साठी आदर्श शिक्षक समिती लातूर चे सर्व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

Tuesday, September 26, 2023

यु डायस प्लस सन 2023-24 लॉगिन सुरू झाली आहे. विद्यार्थी promotion



यु डायस प्लस सन 2023-24 लॉगिन सुरू झाली आहे. विद्यार्थी promotion सुरू झाले आहे. 

Login link 
👇



पदवीधर प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा केंद्रमुखपदी पदोन्नती मिळाल्यास एक वेतन वाढ देणेबाबत आजचा ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय



Today's Important GR - पदवीधर प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा केंद्रमुखपदी पदोन्नती मिळाल्यास एक वेतन वाढ देणेबाबत आजचा ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय.
Download here to click 
⬇️⬇️

https://drive.google.com/file/d/1Gu8ch8V0298N-G2mFHokX4G4LQzl1vpC/view?usp=drivesdk

Friday, September 22, 2023

आली आली गौराई सोन्या रुपयाच्या पावलांन..! आली आली गौराई धन धान्याच्या पावलानं

*आली आली गौराई सोन्या रुपयाच्या पावलांन..! आली आली गौराई धन धान्याच्या पावलांन..!* 

सोन्यामोत्यांच्या पावली , आली अंगणी गौराई, पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई, अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया घरा दारा लाभो सदा कृपेची छाया. 
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राण प्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरीचे त्यापाठोपाठ आगमन होते.
रुणुझुणुत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, घाली लिंबलोण सडा..’ गौरींवर रचलेल्या अशा विविध गाण्यांचा गजर करत तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी प्रत्येक स्त्री गौरीचं थाटामाटात स्वागत करते, कारण ती माहेरवाशीण असते ना!
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. आज गुरुवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत ते तिच्या विसर्जनापर्यंत सारं काही पाहण्याजोगं असतं. खण, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, देवीहार, लक्ष्मीहार, वगैरे शृंगाराने सजलेली ही माहेरवाशिणी प्रत्येकाच्या घरी आणण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणाकडे खडय़ाच्या गौरी आणतात, कोणाकडे तेरडय़ाची, कोणाच्या घरी उभ्या गौरी तर कोणाकडे बैठय़ा. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, तर काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिनहाताच्या असतात. गौर काहींच्या घरी गणपतीची आई म्हणून, तर काहींच्या घरी गणपतीची बायको म्हणून आणली जाते. 
खडय़ाच्या गौर मुख्यत्वेकरून कोकणस्थ लोकांकडे आणल्या जातात. एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. पाणवठय़ावर एखादी जागा स्वच्छ करून तिथे या गौरी ठेवून तिची पूजा व आरती करतात. त्यांना प्रसाद दाखवला जातो. यानंतर गौरी आणणारी जी माहेरवाशीण असेल तिने तोंडात पाण्याची चूळ भरून रस्ताभर ती चूळ न टाकता मुक्या तोंडाने गौरी घरात आणायच्या असतात. 
खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या अगर मुलीच्या हातात ताम्हण किंवा तांब्या असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद-कुंकू लावून तिला ओवाळून मग घरात घेतात. म्हणजेच गौरीला सोनपावलांनी दारातून आत घेऊन येतात. गौरी आणणाऱ्या मुलीने याच पावलांवर पाय ठेवून आत यायचे असते. आत आणल्यानंतर प्रथम गौरीला धान्याचे कोठार, स्वयंपाकाची खोली, नंतर सारे घर दिव्याच्या प्रकाशात दाखवले जाते. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून, खडे ठेवून त्याची हळद-कुंकू, आघाडा, दुर्वा, फुलं, गेजवस्त्र यांनी पूजा करतात. दमून आलेल्या लाडक्या माहेरवाशिणीसाठी पहिल्या दिवशी शेपूची भाजी, भाकरी हा मुख्य जेवणाचा बेत केला जातो. दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवायला बोलावून तिला विडा, दक्षिणा द्यायची पद्धत आहे. बायकांना दुपारी हळदी-कुंकवास बोलावले जाते. या दिवशी गौरीला घावनघाटल्याचा नवेद्य दाखवला जातो. सोबत पुरण, तळण व खीर इ. पदार्थाचा समावेश असतो. तिसरा दिवस विसर्जनाचा. या दिवशी गौरीला नवेद्याला गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नवेद्य दिला जातो. गौरी जाताना रांगोळी म्हणजे रुपयाची पाऊले रेखाटतात. गौरीच्या बरोबर दुपारच्या नवेद्याची शिदोरी किंवा दही-पोह्यंची शिदोरी दिली जाते. जातानाही मुकेपणानेच पाणवठय़ावर जाऊन तिथे पुन्हा एकदा आरती करून हळदी-कुंकू, अक्षता वाहून वाहत्या पाण्यात गौरींचं विसर्जन केलं जातं. 
देशस्थांकडे काहींच्या घरी बैठय़ा अथवा उभ्या गौरी बसवतात. यांच्याकडे गौरींचे मुखवटे घरच्या घरीच सांभाळून ठेवलेले असतात. हे मुखवटे पितळी, मातीचे अथवा शाडूचे असतात. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवतात. हे मुखवटे घरच्या सुना अथवा एक सासुरवाशिणी व माहेरवाशिणी अशा दोघी दारातून बाहेर जाऊन पुन्हा दारातून घरात आणतात. त्यानंतर दोघीही गौरीला घरातील तिजोरी, अन्नधान्याचे डबे इ. दाखवून ‘उदंड’ तसेच ‘गौरी आल्या सोन्याच्या पावली, महालक्ष्मी आल्या रुप्याच्या पावली’ असं म्हणण्याची पद्धत आहे.  अन्नधान्याचे डबे, धान्याचे कोठार, दुधाचे पातेले अशा ठिकाणी एकीने ‘इथे काय आहे’ विचारल्यावर दुसरीने ‘उदंड’ असं उत्तर द्यायचं असतं. धान्याची साठवण, दूध-दुभत्याचे भांडे तेथे असलेले ‘उदंड राहो’ असं त्यामागचा दृष्टिकोन मानला जातो. हे मुखवटे पितळी किंवा लाकडी स्टॅण्डवर बसवतात किंवा कोणी कोठय़ांना साडय़ा नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे, काही पितळी तर काही लाकडाचे असतात आणि काही ठिकाणी तर हात नसण्याची सुद्धा पद्धत असते. 
त्या दोन गौरींना जेष्ठा आणि कनिष्ठा असे संबोधले जाते. दोघींच्या मध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या आणि तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडून त्याच्यासमोर गव्हाचा चौक घालतात. त्यांना अलंकाराने मढवतात. त्यांना सजवण्यासाठी नवीन साडय़ा, मुकुट, गळ्यातील अलंकार, बांगडय़ा इत्यादींची जोरदार खरेदी झालेलीच असते. त्यामुळे नटल्यानंतरचा त्यांचा थाट, शृंगार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पहिल्या दिवशी भाजी-भाकरीच्या नवेद्याने गौराई तृप्त होते. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. काही लोक विसर्जनाच्या दिवशी ६४ योगिनीच्या फोटोलाही पूजतात. एका घागरीत पाणी भरून ती घागर कर्दळीच्या पानावर घवाच्या राशीवर काकडीच्या फोडी ठेवून त्यावर ठेवतात. तिच्यावर गंधाने ६४ योगिनी काढून त्यावर कलश ठेवून पूजा केली जाते. 

तेरडय़ाची गौर पूजनाची पद्धत ही काहीशी वेगळी आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा भागांत गौरी पूजनाची ही पद्धत बरेचदा आढळून येते. तेरडय़ाचा जुडा एकत्र बांधून पाणवठय़ाजवळ आंघोळ घालून तिची पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात तिचं आगमन केलं जातं. घरी आणल्यावर माहेरवाशिणीने गौरी आणली म्हणून तिने गौर घातली असं म्हटलं जातं. दारातून आत प्रवेश करताना जिने गौर आणली तिच्या पायावर पाणी घालून, हळदी-कुंकू, डोळ्याला पाणी लावून तिला ओवाळून उजव्या पायांनी तिचा घरात प्रवेश होतो. पाटावर अथवा चौरंगावर देवी बसवतात, त्यानंतर साडी नेसवून दागदागिने घालून तिला शेपू व भाकरीचा नवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौरींइतकाच शंकराचा मानही मोठा असतो. घरात शंकराचं आगमन होतं. शंकरालाही पानवठय़ाजवळ आरती करूनच वाजतगाजत घरी आणलं जात. या दिवशी पुरणपोळी आणि मिक्स भाजीचा नवेद्य दाखवला जातो. या दिवशी सुपात शंकर-गौरी दोघांनाही सजवून औसा पूजन केले जाते. तेरडय़ाला म्हणजेच गौरीला विडय़ाच्या पानाचे डोळे, नाक, ओठ काढून त्यात सोन्याचे मणीमंगळसूत्र, चांदीची जोडवी हे महत्त्वाचे दागिने परिधान करतात. तर शंकरालासुद्धा टोपी, शर्ट, उपरणं, धोतर नेसवून सजवलं जातं. भस्माने विडय़ाच्या पानाचे कान, नाक, डोळेही काढतात. त्यानंतर गौरी-गणपतीची आरती करून गौण नवेद्य दाखवला जातो. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना गौरीला औसा पूजन करावे लागते. सुपात दोऱ्याच्या गुंडय़ा गुंडाळून सुपात खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, आक्रोड, बदाम, खारीक, पाच तऱ्हेची फळं, पाच भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी सूप सजवून सुवासिनी ते सूप पाच वेळा गौरीभोवती ओवाळतात नंतर ते गौरीच्या पुढय़ात ठेवतात. गौरीला नमस्कार करून मनातील इच्छा बोलतात. औसायला आलेल्या त्या सुवासिनींची ज्यांचाकडे गौरी असते ते खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करतात. सुवासिनींच्या सुपातही पसे ठेवण्याची प्रथा आहे. रात्री गौर जागवतात. गौरीचे खेळ खेळले जातात. त्या वेळी काही स्त्रियांच्या अंगात गौर येते. त्या वेळी तिला कुठून आलीस, काय जेवलीस, असे प्रश्न विचारले जातात. गौरी विसर्जनाच्या दिवशी तिच्या पायांवर पाणी ओतून तिची दृष्ट काढली जाते. त्यानंतर तेरडय़ाची डहाळी घरावर टाकली जाते. सोबत गौरी विसर्जनानंतर पाच खडेही घरावर टाकले जातात. 
गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. 
अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र हा  सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने गौरी आवाहन, पुजन व विसर्जन साजरा करतात 
----------------------------
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
-----------------------------



तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गणेश चतुर्थी या सणाच्या निमित्ताने गणेश मुर्ती प्रदर्शन आयोजित

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गणेश चतुर्थी या सणाच्या निमित्ताने गणेश मुर्ती प्रदर्शन आयोजित*

*तिवटग्याळ - आज दि.20-9-2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या च्या वतीने आज दिनांक 20/9/2023 रोजी गणेश चतुर्थी या सणा च्या निमित्ताने कला कार्यानुभव या विषयावर अंतर्गत माती कामा पासून गणेश मुर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रथम शाळेतील परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की आज आपण गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी कला कार्यानुभव या विषया अंतर्गत माती कामा पासून गणेश मुर्ती करुन आणावे व प्रदर्शन मांडण्यात यावे व या गणेश मुर्ती प्रदर्शनात प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थाना वही व पेन बक्षीस म्हणून दिले जाणार आहे असे सविस्तर सांगितले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांनी माती पासून तयार करण्यात आलेल्या गणेश मुर्ती चे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी गणेश चतुर्थी या सणा विषयी सविस्तर माहिती दिली. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदू धर्मानुसार, या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं. या दिवशी लाडक्या गणरायाची मूर्ती जयघोषात घरी आणतात आणि त्याची स्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते.जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो. तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे, विशेषतः अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता) आणि नशीब आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो. कला आणि विज्ञानाचा संरक्षक; तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. सुरुवातीसाठीचा देव म्हणून, त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते. लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षक म्हणून गणेशाचे आवाहन केले जाते. अनेक ग्रंथ त्याच्या जन्म आणि पराक्रमांशी संबंधित पौराणिक कथा सांगतात. गणपती चे श्रीक्षेत्र अष्टविनायक खुप जाग्रत व पावन आहेत. अनेक गणेश भक्त आवर्जून या क्षेत्राला भेट देतात. १ मोरगांव, २थेऊर, ३ सिद्धटेक, ४ रांजणगाव, ५ ओझर, ६ लेण्याद्री, ७ महड, ८ पाली. हा गणेश चतुर्थी सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. सविस्तर माहिती दिल्या नंतर शाळेतील मांडलेल्या गणेश मुर्ती प्रदर्शन पाहण्यात आले. प्रदर्शनातून प्रथम क्रमांक गणेश राजकुमार श्रीमंगले, द्वितीय क्रमांक रितीका शिवराज पाटील , तृतीय क्रमांक सरस्वती अनिल पाटील तसेच प्रोत्साहन पर इंद्रजीत नवनाथ कच्छवे, मंदिरा रमेश साळुंके, अर्थव कैलास तवर, गंगासागर बिरादार, वेदांत पाटील, शैलेश पाटील यांना अभिनंदन करुन शैक्षणिक साहित्य वही व पेन बक्षीस देऊन आले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*