Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, April 13, 2022

संविधानाचे जनक गोर गरीबांच्या हक्कांसाठी जाणिव करुन देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*संविधानाचे जनक गोर गरीबांच्या हक्कांसाठी जाणिव करुन देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

आपल्याला तर माहीतच आहे दरवर्षी १४ एप्रिल ला बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, त्या जयंतीनिमित्त आपण ह्या विचारांना आपल्या जीवनात लागू करू शकतो.आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आपल्याला जिवनात एक नवीन उत्साह देऊन आपले जीवन स्फूर्तिदायक बनविण्यात मदत होते. अशा या महामानवाला त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.
ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो.
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भीमराव रामजी आंबेडकर  भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री तसेचत्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.
अशा या महामानवाला विनम्र अभिवादन.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖ 


  


No comments:

Post a Comment