Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, December 25, 2022

दर्शवेळा अमावस्या म्हणजे ओलघे ओलघे सालम पोलगे गर्जना देत काळ्या आईचा वनमहोत्सव













*दर्शवेळा अमावस्या म्हणजे ओलघे ओलघे सालम पोलगे गर्जना देत काळ्या आईचा वनमहोत्सव*


शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी दर्शवेळा अमावस्या आहे या निमित्ताने लातूर, बीड, उस्मानाबाद व खास लेख. सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात   रोजी दर्शवेळा अमावस्या सर्व शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना, मित्रांना अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात आमंत्रणे देऊन जेवायला बोलावतात असा हा एक सण आहे; या सणाला *‘येळ अमावस्या’* अस म्हणायची पद्धत आहे.

मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
मार्गशिर्ष अमावस्येला सोलापुर जिल्ह्याचा काही भाग, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात "वेळा अमावस्या" हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण साजरा केला जातो. हा सण शेजारील कर्नाटकातुन महाराष्ट्रात आला आहे.
ही आमावस्या *दर्शवेळा अमावस्या* म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.वेळ अमावस्या काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या पवित्र भावनं कर्नाटक आणि लगतच्या मराठवाड्यातील लातूर,बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत दर्श
अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
मुळातील शब्द हा 'येळी अमावस्या' असून त्याचे अपभ्रंश हे 'वेळ अमावस्या' झाले. या सणांची ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते. येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते.  इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणताः डिसेंबर-जानेवारी या दिवसात ही अमावस्या असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो. आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात. आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत. थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते. केवळ आंबिलावर हा बेट थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावरण पदार्थ! या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो. 
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर या सणादिवशी शेतात एक खोप बनवून तेथे निसर्गदेवतेची विविध धान्यांची रास मांडून तेथे फुले, आंब्याची पाने, ज्वारीच्या धाटांची सजावट केली जाते.  ‘ओलघे, ओलघे सालम पोलगे’ असे म्हणत प्रदक्षिणा घातली जाते. शिवारातील पक्ष्यांनो, प्राण्यांनो आपणा सर्वांना माणसाप्रमाणेच जेवणाचे आमंत्रण आहे. तुमच्या आशीर्वादाने चारी बाजूंनी आमचे शिवार फुलू दे, अशी प्रार्थना बळिराजा जणू काही करत असतो. एवढंच नाही तर काही भागात ज्वारीचा खिचडा करतात तर काही भागात कोंदीच्या पोळ्या (तिळाच्या पोळ्या), धपाटे, गव्हाची खीर, बाजरीच्या भाकरी केल्या जातात. ग्रामीण भागात या सणाचे विशेष महत्त्व दिसून येते. या वेळी पाणी आणि अंबिल ठेवण्यासाठी बिंदगी व झाकणी त्याचबरोबर सांजमोरवे आणि झाकणीचा उपयोग केला जातो. कदाचित हे नव्या पिढीसाठी अपरिचित शब्द असतील परंतु याचा वापर आजही ब-याच ठिकाणी केला जातो. आणले जाते.नुकत्याच आलेल्या वाटाणा , तुरीचे दाणे घालुन केलेली भाजी ( भज्जी ), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावुन केलेली आंबील अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली “भज्जी”, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे. जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं. जमा झालेल्या स्त्रिया येणार्‍या-जाणार्‍याच्या जेवनाच बघतात तर जेवण झाल्यावर पुरुष मंडळी, बाळ गोपाळ, तरूण तरणी काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.
भारतात अनेक सण, परंपरा अन प्रथा आहेत. त्यातील काही आता कालबाह्य झाल्या आहेत, काहींना आपण विसरत आहोत तर काहींना अंधश्रद्धा म्हणून हिणवल जात. वेळ अमावास्या ही एका परंपरेचा भाग आहे ज्यात अर्थशास्त्र आणि आरोग्यशास्त्र सुद्धा लपलेल आहे. अनेक लोक जुन्या गोष्टी विसरून एकत्र येतात, नव्या ओळखी होतात आणि मनाला प्रसन्नताही लाभते. अशा प्रकारे वेळ अमावस्या हा सण लहाना पासून ते मोठ्या पर्यंत अतिशय आनंददाने व उत्साहाने साजरा करतात.
--------------------------
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
--------------------------


No comments:

Post a Comment